श्री रामदासस्वामिंचे श्री मनाचे श्लोक
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १॥
मना सज्जना भक्तिपंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २॥
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा ।
सदाचार हा थोर सांडू नये तो
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना सर्वथा नीति सोडू नको हो
मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा
मना सत्य संकल्प जीवी धरावा ।
मना कल्पना ते नको वीषयांची
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी ।
नको रे मना सर्वदा अंगिकारू
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ।
मना चंदनाचे परी त्वां झिजावे
परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ।
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारिखे दुःख मोठे ॥ ९॥
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ।
देहेदुःख ते सूख मानीत जावे
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १०॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ।
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११॥
मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ॥ १२॥
मना सांग पां राखणा काय जाले
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ।
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ १३॥
जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला
परी शेवटी काळमूखी निमाला ।
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी
जितां बोलती सर्वही जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्वही मानिताती
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे ।
पुरेना जनीं लोभ रे क्शोभ त्याते
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६॥
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते
अकस्मात होणार होऊन जाते ।
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७॥
मना राघवेवीण आशा नको रे
मना मानवाची नको कीर्ति तू रे ।
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।
मना सत्य ते सत्य वाचे वदावे
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९॥
बहू हिंपुटी होईजे मायपोटी
नको रे मना यातना तेचि मोठी ।
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २०॥
मना वासना चूकवी येरझारा
मना कामना सोडि रे द्रव्यदारा ।
मना यातना थोर हे गर्भवासी
मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१॥
मना सज्जना हीत माझे करावे
रघूनायका दृढ चित्ती धरावे ।
महाराज तो स्वामि वायुसुताचा
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२॥
न बोले मना राघवेवीण काही
मनी वाउगे बोलता सूख नाही ।
घडीने घडी काळ आयुष्य नेतो
देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३॥
रघूनायकावीण वाया शिणावे
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ।
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४॥
मना वीट मानू नको बोलण्याचा
पुढे मागुता राम जोडेल कैचा ।
सुखाची घडी लोटता सूख आहे
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५॥
देहेरक्शणाकारणे यत्न केला
परी शेवटी काळ घेऊन गेला
करी रे मना भक्ति या राघवाची
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६॥
भवाच्या भये काय भीतोस लंडी
धरी रे मना धीर धाकासि सांडी ।
रघूनायकासारिखा स्वामि शीरी
नुपेक्शी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७॥
दिनानाथ हा राम कोदंडधारी
पुढे देखता काळ पोटी थरारी ।
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ २८॥
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ।
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ २९॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ ३०॥
महासंकटी सोडिले देव जेणे
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ।
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ ३१॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली
पदी लागता दिव्य होऊनि गेली ।
जया वर्णिता शीणली वेदवाणी
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ ३२॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला
शशी सूर्य तारांगणे मेघमाला ।
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ ३३॥
उपेक्शी कदा रामरूपी असेना
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ।
शिरी भार वाहेन बोले पुराणी
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ ३४॥
असे हो जया अंतरी भाव जैसा
वसे हो तया अंतरी देव तैसा ।
अनन्यास रक्शीतसे चापपाणी
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ ३५॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।
सुखानंद आनंद कैवल्यदानी
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ ३६॥
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ।
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी
नुपेक्शी कदा राम दासाभिमानी ॥ ३७॥
मना प्रार्थना तूजला एक आहे
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ।
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
जयाचेनि योगे समाधान बाणे ।
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९॥
मना पाविजे सर्वही सूख जेथे
अती आदरे ठेविजे लक्श तेथे ।
विविके कुडी कल्पना पालटीजे
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४०॥
बहू हिंडता सौख्य होणार नाही
शिणावे परी नातुडे हीत काही ।
विचारे बरे अंतरा बोधवीजे
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१॥
बहुतांपरी हेचि आता धरावे
रघूनायका आपुलेसे करावे ।
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२॥
मना सज्जना एक जीवी धरावे
जनीं आपुले हीत तुवां करावे ।
रघूनायकावीण बोलो नको हो
सदा मानसी तो निजध्यास राहो ॥ ४३॥
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी
कथा आदरे राघवाची करावी ।
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४॥
जयाचेनि संगे समाधान भंगे
अहंता अकस्मात येऊनि लागे ।
तये संगतीची जनीं कोण गोडी
जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५॥
मना जे घडी राघवेवीण गेली
जनीं आपुली ते तुवा हानि केली ।
रघूनायकावीण तो शीण आहे
जनीं दक्श तो लक्श लावूनि पाहे ॥ ४६॥
मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे
जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ।
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७॥
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा
सदा रामनामे वदे सत्य साचा ।
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे
अनेकी सदा एक देवासि पाहे ।
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९॥
नसे अंतरी काम नानाविकारी
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ।
निवाला मनीं लेश नाही तमाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५०॥
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी
प्रपंचीक नाही जयाते उपाधी ।
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१॥
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ।
करी सूखसंवाद जो ऊगमाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२॥
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ।
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३॥
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ।
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४॥
नसे मानसी नष्ट आशा दुराशा
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ।
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५॥
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ।
तया अंतरी क्रोध संताप कैचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६॥
जगी होइजे धन्य या रामनामे
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ।
उदासीनता तत्त्वता सार आहे
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७॥
नको वासना वीषयी वृत्तिरूपे
पदार्थी जडे कामना पूर्वपापे ।
सदा राम निष्काम चिंतीत जावा
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८॥
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ।
मनी कामना राम नही जयाला
अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९॥
मना राम कल्पतरू कामधेनू
निधी सार चिंतामणी काय वानू ।
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता
तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६०॥
उभा कल्पवृक्शातळी दुःख वाहे
तया अंतरी सर्वदा तेचि आहे ।
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा
पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१॥
निजध्यास तो सर्व तूटोनी गेला
बळे अंतरी शोक संताप ठेला ।
सुखानंद आनंद भेदे बुडाला
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२॥
घरी कामधेनू पुढे ताक मागे
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ।
करी सार चिंतामणी काचखंडे
तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३॥
अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना
अती काम त्या राम चित्ती वसेना ।
अती लोभ त्या क्शोभ होईल जाणा
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४॥
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ।
धरी रे मना आदरे प्रीति रामी
नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५॥
नव्हे सार संसार हा घोर आहे
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे
करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६॥
घनश्याम हा राम लावण्यरूपी
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ।
करी संकटी सेवकांचा कुडावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७॥
बळे आगळा राम कोदंडधारी
महाकाळ विक्राळ तोही थरारी ।
पुढे मानवा किंकरा कोण केवा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८॥
सुखानंदकारी निवारी भयाते
जनीं भक्तिभावे भजावे तयाते ।
विवेके त्यजावा अनाचार हेवा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९॥
सदा रामनामे वदा पूर्णकामे
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ।
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७०॥
जयाचेनि नामे महादोष जाती
जयाचेनि नामे गती पाविजेती ।
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१॥
न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ।
महाघोर संसारशत्रू जिणावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२॥
देहेदंडणेचे महादुःख आहे
महादुःख ते नाम घेता न राहे ।
सदाशीव चिंतीतसे देवदेवा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३॥
बहुतांपरी संकटे साधनांची
व्रते दान उद्यापने ती धनाची ।
दिनाचा दयाळू मनी आठवावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४॥
समस्तांमधे सार साचार आहे
कळेना तरी सर्व शोधून पाहे ।
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५॥
नव्हे कर्म ना धर्म ना योग काही
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।
म्हणे दास विश्वास नामी धरावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६॥
करी काम निष्काम या राघवाचे
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ।
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७॥
अहो ज्या नरा रामविश्वास नाही
तया पामरा बाधिजे सर्व काही ।
महारज तो स्वामि कैवल्यदाता
वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८॥
मना पावना भावना राघवाची
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ।
भवाची जिवा मानवा भूलि ठेली
नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९॥
धरा श्रीवरा त्या हरा अंतराते
तरा दुस्तरा त्या परा सागराते ।
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते
करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८०॥
मना मत्सरे नाम सांडू नको हो
अती आदरे हा निजध्यास राहो ।
समस्तांमधे नाम हे सार आहे
दुजी तूळणा तूळिताही न साहे ॥ ८१॥
बहू नाम या रामनामी तुळेना
अभाग्या नरा पामरा हे कळेना ।
विषा औषधा घेतले पार्वतीशे
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२॥
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो
उमेसी अती आदरे गूण गातो ।
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे
परी अंतरी नामविश्वास तेथे ॥ ८३॥
विठोने शिरी वाहिला देवराणा
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४॥
भजा राम विश्राम योगेश्वरांचा
जपू नेमिला नेम गौरीहराचा ।
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५॥
मुखी राम विश्राम तेथेचि आहे
सदानंद आनंद सेवोनि आहे ।
तयावीण तो शीण संदेहकारी
निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६॥
मुखी राम त्या काम बाधू शकेना
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।
हरीभक्त तो शक्त कामास भारी
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७॥
बहू चांगले नाम या राघवाचे
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८॥
जनीं भोजनीं नाम वाचे वदावे
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवीत जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९॥
न ये राम वाणी तया थोर हाणी
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ।
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९०॥
नको वीट मानू रघूनायकाचा
अती आदरे बोलिजे राम वाचा ।
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१॥
अती आदरे सर्वही नामघोषे
गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ।
हरी तिष्ठतू तोषला नामघोषे
विशेषे हरामानसी रामपीसे ॥ ९२॥
जगी पाहता देव हा अन्नदाता
तया लागली तत्त्वता सार चिंता ।
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे
मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३॥
तिन्ही कोप जाळू शके कोप येता
निवाला हरू तो मुखे नाम घेता ।
जपे आदरे पार्वती विश्वमाता
म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४॥
अजामेळ पापी वदे पुत्रकामे
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।
शुकाकारणे कुंटणी राम वाणी
मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५॥
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी
जपे रामनामावळी नित्यकाळी ।
पिता पापरूपी तया देखवेना
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६॥
मुखी नाम नाही तया मुक्ति कैची
अहंतागुणे यातना ते फुकाची ।
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७॥
हरीनाम नेमस्त पाषाण तारी
बहू तारिले मानवी देहधारी ।
तया रामनामी सदा जो विकल्पी
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८॥
जगी धन्य वाराणसी पुण्यराशी
तयेमाजि आता गती पूर्वजांसी ।
मुखे रामनामावळी नित्यकाळी
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९॥
यथासांग रे कर्म तेही घडेना
घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ।
दया पाहता सर्व भूती असेना
फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १००॥
जया नावडे नाम त्या यम जाची
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ।
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१॥
अती लीनता सर्वभावे स्वभावे
जना सज्जनालागि संतोषवावे ।
देहे कारणी सर्व लावीत जावे
सगूणी अती आदरेसी भजावे ॥ १०२॥
हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी
देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ।
परद्रव्य आणीक कांता परावी
यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥ १०३॥
क्रियेवीण नानापरी बोलिजेते
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ।
मना कल्पना धीट सैराट धावे
तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४॥
विवेके क्रिया आपुली पालटावी
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ।
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा
मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५॥
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ।
दया सर्वभूती जया मानवाला
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६॥
मना कोप आरोपणा ते नसावी
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी
मना होइ रे मोक्शभागी विभागी ॥ १०७॥
मना सर्वदा सज्जनाचेनि योगे
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ।
क्रियेवीण वाचाळता ते निवारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८॥
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा
जनीं वादसंवाद सूखे करावा ।
जगी तोचि तो शोकसंतापहारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९॥
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे
विवेके अहंभाव याते जिणावे ।
अहंतागुणे वाद नाना विकारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११०॥
हिताकारणे बोलणे सत्य आहे
हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ।
हिताकारणे बंड पाखांड वारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११॥
जनीं सांगता ऐकता जन्म गेला
परी वादवेवाद तैसाचि ठेला ।
उठे संशयो वाद हा दंभधारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२॥
जनीं हीत पंडीत सांडीत गेले
अहंतागुणे ब्रह्मराक्शस जाले ।
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३॥
फुकाचे मुखी बोलता काय वेचे
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४॥
तुटे वाद संवाद तेथे करावा
विविके अहंभाव हा पालटावा ।
जनीं बोलण्यासारखे आचरावे
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५॥
बहू शापिता कष्टला अंबऋषी
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ।
दिला क्शीरसिंधु तया ऊपमानी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६॥
धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे
कृपा भाकिता दीधली भेटि जेणे ।
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७॥
गजेंदू महासंकटी वास पाहे
तयाकारणे श्रीहरी धावताहे ।
उडी घातली जाहला जीवदानी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८॥
अजामेळ पापी तया अंत आला
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ।
अनाथासि आधार हा चक्रपाणी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९॥
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी
धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ।
जना रक्शणाकारणे नीच योनी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२०॥
महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ।
न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१॥
कृपा भाकिता जाहला वज्रपाणी
तया कारणे वामनू चक्रपाणी ।
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२॥
अहल्येसतीलागी आरण्यपंथे
कुडावा पुढे देव बंदी तयाते ।
बळे सोडिता घाव घाली निशाणी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२३॥
तये द्रौपदीकारणे लागवेगे
त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ।
कळीलागि जाला असे बौद्ध मौनी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४॥
अनाथां दिनांकारणे जन्मताहे
कलंकी पुढे देव होणार आहे ।
तया वर्णिता शीणली वेदवाणी
नुपेक्शी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५॥
जनांकारणे देव लीलावतारी
बहुतांपरी आदरे वेषधारी ।
तया नेणती ते जन पापरूपी
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६॥
जगी धन्य तो राममूखे निवाला
कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ।
देहेभावना रामबोधे उडाली
मनोवासना रामरूपी बुडाली ॥ १२७॥
मना वासना वासुदेवी वसो दे
मना वासना कामसंगी नसो दे ।
मना कल्पना वाउगी ते न कीजे
मना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८॥
गतीकारणे संगती सज्जनाची
मती पालटे सूमती दुर्जनाची ।
रतीनायिकेचा पती नष्ट आहे
म्हणोनी मनातीत होवोनी राहे ॥ १२९॥
मना अल्प संकल्प तोही नसावा
सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ।
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा
रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३०॥
भजावा जनीं पाहता राम एकू
करी बाण एकू मुखी शब्द एकू ।
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू
धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले
तयाचेनि संतप्त तेही निवाले ।
बरे शोधल्यावीण बोलो नको हो
जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२॥
हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी
जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ।
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३॥
नसे गर्व आंगी सदा वीतरागी
क्शमा शांति भोगी दयादक्श योगी ।
नसे लोभ ना क्शोभ ना दैन्यवाणा
इही लक्शणी जाणिजे योगिराणा ॥ १३४॥
धरी रे मना संगती सज्जनाची
जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ।
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५॥
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे
भयातीत ते संत आनंत पाहे ।
जया पाहता द्वैत काही दिसेना
भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६॥
जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ।
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७॥
भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले
जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आले ।
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८॥
पुढे पाहता सर्वही कोंदलेसे
अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ।
अभावे कदा पुण्य गाठी पडेना
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९॥
जयाचे तया चूकले प्राप्त नाही
गुणे गोविले जाहले दुःख देही ।
गुणावेगळी वृत्ति तेही वळेना
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४०॥
म्हणे दास सायास त्याचे करावे
जनीं जाणता पाय त्याचे धरावे ।
गुरू अंजनेवीण ते आकळेना
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४१॥
कळेना कळेना कळेना ढळेना
ढळे नाढळे संशयोही ढळेना ।
गळेना गळेना अहंता गळेना
बळे आकळेना मिळेना मिळेना ॥ १४२॥
अविद्यागुणे मानवा ऊमजेना
भ्रमे चूकले हीत ते आकळेना ।
परीक्शेविणे बांधले दृढ नाणे
परी सत्य मिथ्या असे कोण जाण ॥ १४३॥
जगी पाहता साच ते काय आहे
अती आदरे सत्य शोधून पाहे ।
पुढे पाहता पाहता देव जोडे
भ्रम भ्रांति अज्ञान हे सर्व मोडे ॥ १४४॥
सदा वीषयो चिंतिता जीव जाला
अहंभाव अज्ञान जन्मास आला ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावे ॥ १४५॥
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी
अकस्मात आकारले काळ मोडी ।
पुढे सर्व जाईल काही न राहे
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४६॥
फुटेना तुटेना चळेना ढळेना
सदा संचले मीपणे ते कळेना ।
तया एकरूपासि दूजे न साहे
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४७॥
निराकार आधार ब्रह्मादिकांचा
जया सांगता शीणली वेदवाचा ।
विवेके तदाकार होऊनि राहे
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४८॥
जगी पाहता चर्मचक्शी न लक्शे
जगी पाहता ज्ञानचक्शी निरक्शे ।
जनीं पाहता पाहणे जात आहे
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४९॥
नसे पीत ना श्वेत ना श्याम काही
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही ।
म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १५०॥
खरे शोधिता शोधिता शोधिताहे
मना बोधिता बोधिता बोधिताहे ।
परी सर्वही सज्जनाचेनि योगे
बरा निश्चयो पाविजे सानुरागे ॥ १५१॥
बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा
परी अंतरी पाहिजे तो निवाडा ।
मना सार साचार ते वेगळे रे
समस्तांमधे एक ते आगळे रे ॥ १५२॥
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने
समाधान काही नव्हे तानमाने ।
नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागे
समाधान ते सज्जनाचेनि योगे ॥ १५३॥
महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ।
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥ १५४॥
दिसेना जनीं तेची शोधूनि पाहे
बरे पाहता गूज तेथेचि आहे ।
करी घेऊ जाता कदा आढळेना
जनीं सर्व कोंदाटले ते कळेना ॥ १५५॥
म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे
अतर्कासि तर्की असा कोण आहे ।
जनीं मीपणे पाहता पाहवेना
तया लक्शिता वेगळे राहवेना ॥ १५६॥
बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे
जया निश्चयो येक तोही न साहे ।
मती भांडती शास्त्रबोधे विरोधे
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥ १५७॥
श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे
स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे ।
स्वये शेष मौनावला स्थीर पाहे
मना सर्व जाणीव सांडून राहे ॥ १५८॥
जेणे मक्शिका भक्शिली जाणिवेची
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ।
अहंभाव ज्या मानसीचा विरेना
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥ १५९॥
नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नना विकारी ॥
नको रे मना शीकवू पूढिलांसी ।
अहंभाव जो राहिला तूजपासी ॥ १६०।
अहंतागुणे सर्वही दुःख होते
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ।
सुखी राहता सर्वही सूख आहे
अहंता तुझी तुंची शोधून पाहे ॥ १६१॥
अहंतागुणे नीति सांडी विवेकी
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ।
परी अंतरी सर्वही साक्श येते
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥ १६२॥
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला
देहातीत ते हीत सांडीत गेला ।
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६३॥
मने कल्पिला वीषयो सोडवावा
मने देव निर्गूण तो ओळखावा ।
मने कल्पिता कल्पना ते सरावी
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६४॥
देहादीक प्रपंच हा चिंतियेला
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ।
हरीचिंतने मुक्तिकांता करावी
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६५॥
अहंकार विस्तारला या देहाचा
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा ।
बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६६॥
बरा निश्चयो शाश्वताचा करावा
म्हणे दास संदेह तो वीसरावा ।
घडीने घडी सार्थकाची धरावी
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६७॥
करी वृत्ती जो संत तो संत जाणा
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ।
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते
परी सज्जना केवि बाधू शके ते ॥ १६८॥
नसे अंत आनंत संता पुसावा
अहंकारविस्तार हा नीरसावा ।
गुणेवीण निर्गूण तो आठवावा
देहेबुद्धिचा आठवू नाठवावा ॥ १६९॥
देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी
विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी ।
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे
म्हणोनि सदा तेचि शोधीत जावे ॥ १७०॥
असे सार साचार ते चोरलेसे
इही लोचनी पाहता दृश्य भासे ।
निराभास निर्गूण ते आकळेना
अहंतागुणे कल्पिताही कळेना ॥ १७१॥
स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ।
मुळी कल्पना दो रुपे तेचि जाली
विवेके तरी स्वस्वरूपी मिळली ॥ १७२॥
स्वरूपी उदेला अहंकार राहो
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ।
दिशा पाहता ते निशा वाढताहे
विवेके विचारे विवंचूनि पाहे ॥ १७३॥
जया चक्शुने लक्शिता लक्शवेना
भवा भक्शिता रक्शिता रक्शवेना ।
क्शयातीत तो अक्शयी मोक्श देतो
दयादक्श तो साक्शिने पक्श घेतो ॥ १७४॥
विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ।
हरू जाळितो लोक संहारकाळी
परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५॥
जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा
असंख्यात संख्या करी कोण शक्रा ।
जगी देव धुंडाळिता आढळेना
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ॥ १७६॥
तुटेना फुटेना कदा देवराणा
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ।
कळेना कळेना कदा लोचनासी
वसेना दिसेना जगी मीपणासी ॥ १७७॥
जया मानला देव तो पूजिताहे
परी देव शोधूनि कोणी न पाहे ।
जगी पाहता देव कोट्यानुकोटी
जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥ १७८॥
तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले
तया देवरायासि कोणी न बोले ।
जगी थोरला देव तो चोरलासे
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९॥
गुरु पाहता पाहता लक्श कोटी
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ।
मनी कामना चेटके धातमाता
जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥ १८०॥
नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ।
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू
जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधू ॥ १८१॥
नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ।
मुखे बोलिल्यासारखे चालताहे
मना सद्गुरू तोचि शोधूनि पाहे ॥ १८२॥
जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी
कृपाळू मनस्वी क्शमावंत योगी ।
प्रभू दक्श व्युत्पन्न चातुर्य जाणे
तयाचेनि योगे समाधान बाणे ॥ १८३॥
नव्हे तोचि जाले नसे तेचि आले
कळो लागले सज्जनाचेनि बोले ।
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे
मना संत आनंत शोधीत जावे ॥ १८४॥
लपावे अती आदरे रामरूपी
भयातीत निश्चीत ये स्वस्वरूपी ।
कदा तो जनीं पाहताही दिसेना
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥ १८५॥
सदा सर्वदा राम सन्नीध आहे
मना सज्जना सत्य शोधून पाहे ।
अखंडीत भेटी रघूराजयोगू
मना सांडि रे मीपणाचा वियोगू ॥ १८६॥
भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे
परी सर्वही स्वस्वरूपी न साहे ।
मना भासले सर्व काही पहावे
परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १८७॥
देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे ।
विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे
परी संग सोडूनि सूखे रहावे ॥ १८८॥
मही निर्मिली देव तो ओळखावा
जया पाहता मोक्श तत्काळ जीवा ।
तया निर्गुणालागी गूणी पहावे
परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १८९॥
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता
पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता ।
तया निर्विकल्पासि कल्पीत जावे
परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १९०॥
देहेबुद्धिचा निश्चयो जया ढळेना
तया ज्ञान-कल्पांतकाळी कळेना ।
परब्रह्म ते मीपणे आकळेना
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥ १९१॥
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे
दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे ।
तया खूण ते हीन दृष्टांत पाहे
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥ १९२॥
नव्हे जाणता नेणता देवराणा
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ।
नव्हे दृश्य अदृश्य साक्शी तयाचा
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥ १९३॥
वसे हृदयी देव तो कोण कैसा
पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा ।
देहे टाकिता देव कोठे पहातो
परी मागुता ठाव कोठे रहातो ॥ १९४॥
वसे हृदयी देव तो जाण ऐसा
न्स्भ्स्स्चेपरी व्यापकू जाण तैसा ।
सदा संचला येत ना जात काही
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥ १९५॥
नभी वावरे जा अणूरेणु काही
रिता ठाव या राघवेवीण नाही ।
तया पाहता पाहता तोचि जाले
तेथे लक्श आलक्श सर्वे बुडाले ॥ १९६॥
नभासारिखे रूप या राघवाचे
मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे ।
तया पाहता देहबुद्धि उरेना
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥ १९७॥
नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे
रघूनायका ऊपमा ते न साहे ।
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥ १९८॥
अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे
तेथे तर्क संपर्क तोही न साहे ।
अती गूढ ते दृश्य तत्काळ सोपे
दुजेवीण जे खूण स्वामिप्रतापे ॥ १९९॥
कळे आकळे रूप ते ज्ञान होता
तेथे आटली सर्वसाक्शी अवस्था ।
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥ २००॥
कदा ओळखीमाजि दूजे दिसेना
मनी मानसी द्वैत काही वसेना ।
बहूतां दिसां आपली भेटि जाली
विदेहीपणे सर्व काया निवाली ॥ २०१॥
मना गूज रे तूज हे प्राप्त झाले
परी अंतरी पाहिजे यत्न केले ।
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी
धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥ २०२॥
मना सर्वही संग सोडूनि द्यावा
अती आदरे सज्जनाचा धरावा ।
जयाचेनि संगे महादुःख भंगे
जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ॥ २०३॥
मना संग हा सर्वसंगास तोडी
मना संग हा मोक्श तात्काळ जोडी ।
मना संग हा साधना शीघ्र सोडी
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥ २०४॥
मनाची शते ऐकता दोष जाती
मतीमंद ते साधना योग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥ २०५॥
मनोबोधाची आरती
वेदांचें जें गुह्य शास्त्रांचें जें सार ।
प्राकृत शब्दांमाजी केला विस्तार ॥
कर्म उपासना ज्ञान गंभीर ।
ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ॥
जय देव जय देव जय मनोबोधा ।
पंचप्राणें आरति तुज स्वात्मशुद्धा ॥
जय देव जय देव ॥
दोन शतें पांच श्लोक हे जाण ।
श्रवणें अर्थें साधक पावति हे खूण ॥
परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण ।
यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ॥
जय देव जय देव ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
भुजङ्गप्रयात वृत्त
0-- 0-- 0-- 0--
Encoded and proofread by Sunder Hattangadi